महाराष्ट्रात मराठीच हवी!”; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला रितेश देशमुख यांचा पाठिंबा
“महाराष्ट्रात मराठीच हवी!”; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला रितेश देशमुख यांचा पाठिंबा
मुंबई:राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या निर्णयाला लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला असून, “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असलीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना रितेश म्हणाले,
“महाराष्ट्रात प्रवास करणारे बहुतांश नागरिक मराठी भाषिक असतात. आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा तिथली भाषा समजून घेण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राहताना आणि काम करताना मराठी बोलणे आवश्यक आहे.”
परिवहन मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून, त्याचे स्वागतच केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने परिवहन विभागांतर्गत रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे स्थानिक भाषेला प्राधान्य देणे आणि प्रवाशांशी संवाद सुलभ करणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया वाढणार?
रितेश देशमुख यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्याने या निर्णयाला पाठिंबा दिल्यामुळे या मुद्द्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत या निर्णयावर समर्थन आणि विरोध दोन्ही प्रतिक्रिया वाढू शकतात.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
