पारध परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत पानंद रस्त्यासंदर्भात महेंद्र बेराड यांचा आक्रमक आंदोलनाचा इशारा*

*पारध परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत पानंद रस्त्यासंदर्भात महेंद्र बेराड यांचा आक्रमक आंदोलनाचा इशारा*
पारध (प्रतिनिधी)
भोकरदन तालुक्यातील पारध शाहूराजे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत पाणंद रस्त्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला असून,या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रामनगर (चौरीवाडी) येथे जाण्यासाठी, तसेच इतरही शेतकऱ्यांना तातडीने शेत पाणंद रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून मोठे आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महेंद्र बेराड यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ये-जा करण्यासाठी तसेच शेतमाल वाहतुकीसाठी पाणंद रस्ता अत्यंत आवश्यक आहे. दूध उत्पादक शेतकरी, मिरची उत्पादक शेतकरी,भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना चांगला चांगला शेत पाणंद रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी बाराही महिने आणि विशेषता पावसाळ्यात जास्त त्रास सहन करावा लागतो. एका बाजूला महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंदरस्ता योजनेसाठी अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र स्थानिक पातळीवरील संबंधित प्रशासनाकडून या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील वर्षी पारध येथील जिल्हा परिषद शाळेसमोर त्यांनी केलेल्या ‘बेशरम झाड आंदोलनानंतर’ त्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला होता. तसेच गावातील बऱ्याच ठिकाणी विद्युत पथदिवे बंद असल्याबाबत समाज माध्यमावर त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पारध ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये ठिकठिकाणी सोलार लाईट बसवण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने लढा देत असल्याची प्रतिमा निर्माण झाली आहे.
याशिवाय, पारध येथून विविध बस डेपोच्या एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, पत्रकार म्हणूनही त्यांनी विविध सामाजिक समस्या शासनासमोर मांडल्या आहेत.
महेंद्र बेराड यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या मागणीला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.आता प्रशासन या प्रश्नावर कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

