थकित ई-चलनासाठी वाहनचालकांवर जबरदस्ती नाही; वाहतूक पोलिसांना नवे निर्देश
थकित ई-चालानासाठी वाहनचालकांवर जबरदस्ती नाही; वाहतूक पोलिसांना नवे निर्देश
महाराष्ट्रात थकित ई-चालान दंड वसूल करताना वाहनचालकांना जबरदस्ती करून दंड भरण्यास भाग पाडता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्यातील वाहतूक विभागाने दिले आहेत. ४ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, रस्त्यावर वाहन अडवून थकित ई-चालान भरण्यासाठी दबाव टाकणे चुकीचे असून अशा प्रकारची वसुली कायदेशीर मानली जाणार नाही.
परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, वाहन जप्त करण्याचा अधिकार केवळ न्यायालयाकडे आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांशी नम्रतेने वागावे आणि थकित दंड भरण्यासाठी जबरदस्ती करू नये, असे आदेश राज्यातील सर्व वाहतूक आयुक्तालयांना देण्यात आले आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ई-चालान दंड वाहनचालकांनी ऑनलाइन किंवा बँकेमार्फत भरू शकतात. रस्त्यावर थांबवून जबरदस्तीने दंड वसूल करणे योग्य नसल्याचे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र वाहनचालकांनी स्वेच्छेने थकित दंड भरल्यास तो स्वीकारला जाईल.
पार्श्वभूमी
वाहतूक नियमांचे उल्लंघन कॅमेरे आणि विशेष उपकरणांच्या माध्यमातून नोंदवले जाते. त्यानंतर संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर ई-चालान पाठवले जाते. जर दंड भरला गेला नाही, तर त्याबाबत पुढील कारवाई न्यायालयीन प्रक्रियेद्वारे केली जाते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
