मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 20 तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी अडकले

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 20 तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी अडकले
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपिलीन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून तब्बल 15 ते 20 तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे दोन्ही दिशांना हजारो वाहने अडकून पडली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा घाटातील उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यातून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. अपघातानंतर NDRF व इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
या दुर्घटनेमुळे एक्सप्रेसवे तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक प्रवासी अन्न, पाणी व मूलभूत सुविधांशिवाय अडकून पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
दरम्यान, महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना लोनावळा-खंडाळा घाट विभाग टाळण्याचा सल्ला देत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे