Maharashtra

मीरा-भाईंदरमध्ये प्रचाराचा शेवटचा रविवार; राजकीय वातावरण तापले*

*मीरा-भाईंदरमध्ये प्रचाराचा शेवटचा रविवार; राजकीय वातावरण तापले*

मीरा-भाईंदर | प्रतिनिधी
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने रविवारी संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध राजकीय पक्ष, आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांनी जोरदार प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पदयात्रा, रोड शो, कॉर्नर सभा, जाहीर सभा आणि घराघरांत संपर्क मोहिमेद्वारे प्रचाराची अंतिम फेरी गाठण्यात आली.
या प्रचारादरम्यान नागरी विकास, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज, आरोग्य सेवा आणि पुनर्वसन यांसारखे स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी होते. उमेदवारांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेत भविष्यातील विकास आराखडा मतदारांसमोर मांडला.
मीरा रोड, भाईंदर पूर्व व पश्चिम, उत्तन, नवघर, गोल्डन नेस्ट, शीतल नगर, इंद्रलोक, मीरागाव, सिल्व्हर पार्क, प्लेझंट पार्क आणि इतर परिसरांमध्ये प्रचारामुळे मोठी गर्दी पाहायला मिळाली. झेंडे, फलक, घोषणाबाजी, ढोल-ताशे आणि प्रचार वाहनांमुळे परिसरात निवडणुकीचा उत्साह निर्माण झाला होता. काही ठिकाणी समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत प्रचार अधिक तीव्र केला.
दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क होते. संवेदनशील प्रभागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाकडूनही लक्ष ठेवण्यात आले.
येत्या मतदानाच्या दिवशी मीरा-भाईंदरचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button