Maharashtra

निवाऱ्याच्या हक्कासाठी थेरगावकरांचा एल्गार!

निवाऱ्याच्या हक्कासाठी थेरगावकरांचा एल्गार!

ठिकाण: थेरगाव, पिंपरी-चिंचवड
दिनांक: २२ जून २०२५

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भूखंड आरक्षण धोरणामुळे घरांवर येणाऱ्या अन्यायकारक कारवाईविरोधात आवाज उठवण्यासाठी थेरगाव येथील बारणे कॉर्नर परिसरात आज ‘निवारा हक्क संवाद यात्रा’ या नावाने भव्य मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

मोर्चादरम्यान नागरिकांनी फलक आणि घोषणांच्या माध्यमातून आपली मागणी बुलंद आवाजात मांडली. “जुल्मी प्रशासन परत जा”, “डी.पी.तील आरक्षण रद्द करा”, “घरे नियमित झालीच पाहिजेत”, “प्रॉपर्टी कार्ड मिळालेच पाहिजे”, “विकास जनतेसाठी की बिल्डरसाठी?” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या शांततामय मोर्चात महिला, वृद्ध, तरुण, तसेच विद्यार्थी यांचा मोठा सहभाग दिसून आला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेला मोर्चा नागरिकांच्या भावना आणि निर्धार यांचे प्रतीक ठरला.

प्रमुख मागण्या:

भूखंड आरक्षणामुळे होणारी कारवाई थांबवावी

डी.पी.तील आरक्षण तत्काळ रद्द करावे

घरांना त्वरित नियमित करावे

प्रत्येक घरमालकास प्रॉपर्टी कार्ड मिळावे

स्वाभिमानी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “महापालिकेच्या आरक्षण धोरणामुळे अनेक कुटुंबांचे छत हिरावले जात आहे. हा लढा फक्त आमच्या निवाऱ्याच्या हक्कासाठी आहे. आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ.”

या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनाचे लक्ष संबंधित समस्येकडे वेधले जाण्याची शक्यता असून, स्वाभिमानी चळवळ यापुढेही संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button