हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली; आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन.
हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली; आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन.
टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत. आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले असल्याने या जमिनींचे मूळ मालक असलेले आंदोलक शेतकरी संतप्त झाले आहेत. चुल बंद व जेलभरो आंदोलन करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड अजित काळे यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. आपल्या हक्कांच्या जमिनी सरकारकडून परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा सुरू असलेल्या या संघर्षाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
आकारी पडीत शेतकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोरच चुली मांडून त्यावर स्वयंपाक सुरू केला. आपली गुरे ढोरे पोलीस ठाण्याच्या आवारात बांधली. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था चे कारण देत आंदोलकांना कलम 168 खाली नोटिसा बजावल्या होत्या परंतु शेतकऱ्यांनी त्यांना न जुमानता पोलीस ठाण्याच्या आवारातच चुली मांडून आपल्या घरादारासह आंदोलनात सहभाग नोंदवला या अनोख्या जेलभरो आंदोलनामुळे प्रशासनाची मात्र मोठी धावपळ उडाली असून पोलीस ठाण्याच्या आवारात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.’ जमीनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या’ अशा घोषणांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनंतर आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाचा हा तिढा सुटतो का याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेले आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर

