सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी डॉ.मैनाक घोष यांची नियुक्ती;अशोक काकडे यांची मुंबईत पदोन्नतीने बदली.
सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी डॉ.मैनाक घोष यांची नियुक्ती;अशोक काकडे यांची मुंबईत पदोन्नतीने बदली.
सांगली ( प्रतिनिधी ) : राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून,सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी डॉ.मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) पदी पदोन्नतीवर बदली झाली आहे.२७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आले.
अशोक काकडे यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती.सुमारे १३ महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासन,विकासकामे आणि कायदा-सुव्यवस्थेवर आपली पकड बसवली होती.त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची दखल घेऊनच त्यांची आता राज्यस्तरावरील महत्त्वाच्या महामंडळावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष हे २०१७ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.ते मूळचे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी असून त्यांनी बायोकेमिस्ट्री विषयामध्ये पीएच.डी. संपादन केली आहे. सांगलीत येण्यापूर्वी ते धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथेही सीईओ म्हणून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
जिल्ह्यापुढील आव्हाने आणि अपेक्षा डॉ.मैनाक घोष यांच्यासमोर आता सांगली जिल्ह्यातील पाणीप्रश्न,प्रलंबित ड्रायपोर्ट प्रकल्प,मिरजमधील पाणीपुरवठ्याची समस्या आणि आगामी खरीप हंगामाचे नियोजन अशी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामांना नवीन गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ.घोष यांनी आज किंवा उद्यापर्यंत आपला पदभार स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/ सांगली.
७८७५९०३७७७.
