राष्ट्रवादीत धक्कादायक निर्णय: अजितदादांनी नाकारलेले तीन प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मंजूर
राष्ट्रवादीत धक्कादायक निर्णय: अजितदादांनी नाकारलेले तीन प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मंजूर
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असून, ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी पूर्वी नाकारलेले तीन महत्त्वाच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे अखेर मंजूर करण्यात आले आहेत. या अचानक निर्णयाने पक्षगटात अस्वस्थता पसरली आहे.मागील महिन्यात २८ जानेवारीला अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पक्षाच्या विविध आघाड्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी आणि मोटार मालक वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांनी राजीनामे सुपूर्द केले होते.त्या वेळी पक्षपरिस्थिती लक्षात घेऊन अजित पवार यांनी राजीनामे प्रलंबित ठेवले आणि पदाधिकाऱ्यांना काम सुरू ठेवण्याचे सांगितले. मात्र, निधनाला महिनाभर उलटल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणतीही चर्चा न करता हे राजीनामे मंजूर झाले. या निर्णयाने पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, “अजितदादांच्या काळात मिळणारा सन्मान आता मिळत नाही” अशी खंत व्यक्त होत आहे.राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, पक्ष एकत्र ठेवण्याऐवजी अशा घाईने निर्णय का? या घटनेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, आगामी काळात नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

