राजर्षी शाहू महाविद्यालय येथे धुलीवंदनानिमित्त “विचार मंथन” कार्यक्रम संपन्न
राजर्षी शाहू महाविद्यालय येथे धुलीवंदनानिमित्त “विचार मंथन” कार्यक्रम संपन्न

पारध शाहूराजे :(महेंद्र बेराड सर भोकरदन तालुका प्रतिनिधी) येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धुलीवंदनानिमित्त “विचार मंथन” या बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी हा उपक्रम १८ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी समकालीन विषयांवर आपले परखड मत व्यक्त केले. सुभाष साबळे यांनी “रील लाइफ की रिअल लाइफ” या विषयावर भाष्य करत सोशल मीडियाच्या आभासी जगाचे वास्तव आयुष्यावर होणारे परिणाम स्पष्ट केले. प्रा. रामराव रिंडे यांनी “कॉपीमुक्त परीक्षा” या विषयातून शैक्षणिक प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. अनिल मगर यांनी “सण-उत्सवातील वैज्ञानिक दृष्टिकोन” मांडताना परंपरांमागील विज्ञान समजून घेण्याचे आवाहन केले, तर प्रा. रामेश्वर पाडळे यांनी “तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग” या विषयावर जागतिक परिस्थितीचे विश्लेषण केले. उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल यांनी “मराठी शाळेची गळचेपी” या विषयावर भाष्य करत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. सुखदेव मांटे यांनी सर्व वक्त्यांच्या मुद्द्यांचा आढावा घेत कार्यक्रम अधिक समृद्ध केला. श्री. प्रकाश राऊत यांनी “स्व-ची ओळख” या विषयावर मनोगत व्यक्त करत आत्मचिंतनाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमोल बाडगे यांनी केले. अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ पत्रकार, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र लोखंडे यांनी ‘रील’ माध्यमातून समाजप्रबोधन कसे करता येते, याची उदाहरणांसह सविस्तर मांडणी केली.
सूत्रसंचालन प्रा. मंगेश लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे यांनी केले.
यावेळी मिताली मांटे, कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, मुख्याध्यापक विलास लोखंडे, दीपक साळवे, महर्षी पराशर ऋषी इंग्रजी स्कूलचे प्राचार्य अमोल लोखंडे, गायत्री फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विवेक सोनुने यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण होऊन बौद्धिक प्रगल्भतेला चालना मिळाली.


