महाराष्ट्रात नवीन रिक्षा परमिट बंद; १४ लाख परवान्यांनंतर सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात नवीन रिक्षा परमिट बंद; १४ लाख परवान्यांनंतर सरकारचा मोठा निर्णय
मुंबई, ९ मार्च २०२६ – महाराष्ट्रात आजपासून नवीन ऑटो रिक्षांना परमिट देण्यास पूर्ण स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे १४ लाख रिक्षा परमिट वाटप झाले असून वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारने राज्यांना वाहन व्यवस्थापनाबाबत अधिक स्वायत्तता दिल्यानंतर ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये – विशेषतः मुंबई आणि पुणे– नवीन रिक्षा परमिट देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्यात आधीच मोठ्या प्रमाणात रिक्षा कार्यरत असल्याने शहरांमध्ये वाहतूक कोंडी वाढत असून प्रदूषणही गंभीर होत आहे. त्यामुळे नवीन परमिट थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जुन्या रिक्षांच्या बदलासाठी (replacement permit) परमिट देण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रिक्षाचालक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी अनधिकृतपणे चालणाऱ्या रिक्षांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय महाराष्ट्राच्या शहरी वाहतूक धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
प्रतिनिधी ; उमेश कुलकर्णी पुणे
