पश्चिम रेल्वेवर सतत विलंब: लाखो प्रवाशांचे हाल
पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर मागील काही दिवसांपासून लोकल गाड्यांना विलंब
मुंबई : पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर मागील काही दिवसांपासून लोकल रेल्वे गाड्या सातत्याने विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. चर्चगेट–विरार मार्गावर सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत गाड्या उशिराने येत असल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे.
तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणेमधील अडचणी तसेच काही ठिकाणी सुरू असलेली देखभाल दुरुस्तीची कामे ही विलंबाची प्रमुख कारणे असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकल गाड्या वेळापत्रकानुसार न धावल्याने स्थानकांवर मोठी गर्दी होत असून अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. काही वेळा गाड्या रद्द होणे किंवा फेऱ्या उशिरा सुटणे यामुळे प्रवाशांचा त्रास अधिक वाढला आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि विलंब कमी करण्यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच, विलंबाबाबत स्पष्ट आणि वेळेवर माहिती देण्याचीही अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब


