मीरा-भाईंदरमधील मिठागर झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; डोंगरी कारशेड रद्द होणार – मुख्यमंत्री
*मीरा-भाईंदरमधील मिठागर झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; डोंगरी कारशेड रद्द होणार – मुख्यमंत्री फडणवीस*

येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुका या शहराच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा असून, विकासासाठी नागरिकांनी भाजपला मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
मीरा-भाईंदरमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ही निवडणूक कोणत्याही एका उमेदवाराची किंवा पक्षाची नसून, संपूर्ण मीरा-भाईंदरच्या भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिठागर परिसरातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच, मीरा-भाईंदरला मुंबईशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी कोस्टल रोड आणि सी लिंक उभारण्याची योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पर्यावरणाच्या दृष्टीने वादग्रस्त ठरलेल्या दहिसर–भाईंदर मेट्रो रेल्वे मार्गिका क्रमांक ९ अंतर्गत प्रस्तावित डोंगरी कारशेड प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आगामी काळात पायाभूत सुविधा, वाहतूक आणि नागरी सोयी सुविधांवर विशेष भर दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बाळकृष्ण परब
